भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीचं श्रेय घेत स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी या वक्तव्यावरून कोलांटी मारली. मी दोन्ही देशांमधील वादात मध्यस्थी केली नाही. मी केवळ मदत केली आहे, असं ट्रम्प म्हणाले. या भूमिकेमुळं ट्रम्प यांनी पुन्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारत – पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळं अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आश्चर्यकारक विधान केलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत केली होती, असं ट्रम्प म्हणाले. त्याचवेळी त्यांनी या मुद्द्यात थेट मध्यस्थी केल्याचेही स्पष्टपणे सांगितले नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात भारत-पाकिस्तान यांच्यात केलेल्या मध्यस्थीबाबत विधान केले. दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केल्याचे बोलत नाही; पण मागील आठवड्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत जो तणाव अधिक धोकादायक पातळीवर पोहोचला होता, तो निवळण्यास मदत केली, असं ट्रम्प म्हणाले.
भारत-पाकिस्तानमध्ये १० मे रोजी युद्धबंदी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं हवाई हल्ल्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तान बिथरला आणि भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद चिघळला होता.
पाकिस्तानच्या विनंतीनुसार, १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धीबंदीसाठी तयार झाले, असं सांगतानाच ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे अभिनंदनही केले होते.
दोन्ही देशांमधील मध्यस्थीचा ट्रम्प यांचा दावा भारतानं खोडून काढला. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाली, असं ट्रम्प म्हणाले होते. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या वेळी भारत आणि अमेरिका यांच्यात कोणत्याची चर्चेवेळी व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असं भारतानं ठासून सांगितलं. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अमेरिकी नेते संपर्कात होते, पण व्यापाराच्या मुद्द्यावर कुठलीही चर्चा झाली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते


