स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तारीख जशी जवळ येतेय, तसे महाराष्ट्रातील राजकारणही वेगाने बदलत आहे. महायुती आणि मविआ असा विधानसभेसारखा थेट सामना होण्याची शक्यता मावळताना दिसत आहे. कारण, स्थानिक पातळीवरील जुळवाजुळव सुरू आहे. मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना सल्ला देताना निवडणूक महायुतीत लढवा, पण भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नका, असे म्हटले आहे. यावेळी बोलताना शेळके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपदाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावर आमदार सुनील शेळके यांनी थेट हल्लाबोल केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव घेतले, तर विरोधकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव दिलेले असा आरोप केला. विरोधकांनी नगराध्यक्षपदाचे नाव जाहीर करावे आणि पुन्हा एकदा आजमावून बघा, असा थेट हल्लाबोल विरोधकावर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकारी विभाग अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. फक्त पदे घेऊ नका काम करा. पक्षाने जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या नाही तर पदे अडवून ठेवण्यापेक्षा स्वतःहून काम थांबावे असा स्पष्ट इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला. सहकार विभाग आणि शासकीय कमिटीमध्ये संधी मिळलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करणे गरजेचे आहे.. येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच एकजुटीने एकत्रित महायुती म्हणून लढलो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तसेच वडगाव नगरपंचायत, निवडणुकीत एकहाती सत्ता प्रस्थापित होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग होत आहे. यावर बोलताना शेळके म्हणाले भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला प्रवेश देऊ नका. आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव येथील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विकास कामांसाठी माहिती दिली.


