अखिल भारतीय शिक्षा समागम – २०२५ चे आयोजन
अहिल्यानगर-
भारत सरकारचा शिक्षण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय शिक्षा समागम-२०२५ चे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.या राष्ट्रीय शैक्षणिक सोहळ्याचे विशेष निमंत्रण येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना प्राप्त झाले आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या या सोहळ्यामध्ये विविध शैक्षणिक प्रदर्शने व सादरीकरणांमध्ये देखील डॉ.बागूल सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्मिती प्रक्रियेदरम्यान शिक्षण मंत्रालयाच्या आवाहनानुसार डॉ.बागुल यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील नाविन्यपूर्ण शेकडो संकल्पना सादर केल्या होत्या.अध्यापनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स,कोडिंग,रोबोटिक,AR-VR आग्युमेंटेड व वर्चुअल रियालिटी,IOT,सायबर सिक्युरिटी,मशीन लर्निंगचा वापर यांसारख्या आधुनिक शिक्षणाच्या संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले होते.शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून शैक्षणिक योगदानाबद्दल डॉ बागुल यांना निमंत्रण प्राप्त झाले.
२९ जुलै २०२० रोजी सुरू झालेल्या या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडवून भारतीय शिक्षण पद्धतीला जागतिक स्तरावर सक्षम बनवणे आहे.ज्यामध्ये शिक्षणात भारतीय भाषेचा वापर, अध्यापन-अध्ययन अभ्यासक्रम आणि इको-सिस्टममध्ये ai चे एकत्रीकरण, २०३० पर्यंत १००% GER साध्य करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्कल्पना अंमलबजावणीशी संबंधित प्रमुख विषयांचा समावेश आहे. या कार्यक्रमात शिक्षण प्रणालींना बळकटी देण्यासाठी निवडक उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत माध्यमिक विभागात गेल्या २२ वर्षांपासून अध्यापन करताना जागतिक दर्जाचे हजारो शैक्षणिक प्रयोग,उपक्रम व संकल्पना डॉ.बागुल यांनी राबवल्या आहेत.वर्ल्ड टीचर फोरम,एनसीईआरटी,एन सीटीई,एन एम एम यासारख्या शेकडो राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठांवर देखील डॉ.बागुल काम करत आहेत.


