राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत.
निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.


