गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं असू, पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये, असा विचारही सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
गरीब शेतकरी 40 – 40 वर्षे शेतात राबतात. कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा विचार करतात. या शेतकऱ्यांना आम्ही आत्महत्या करू देणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा कधी करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, बावनकुळे यांनी फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या निकषात नेमके कोणते शेतकरी बसणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळले जाणार, शेतकऱ्यांची गरिबी ठरवण्याचा मापदंड काय असणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. देशातील भाजपशासित राज्यांमध्ये मात्र ही योजना सुरू असून, महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच केंद्र सरकारने एक कोटी लखपती दीदी योजना सुरू केल्याचं सांगत, आता राज्यातील महिलांना विनातारण, विनाहमी पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते.


