राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेती आणि घरांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी काही नागरिक आणि जनावरं यांचा देखील मृत्यू झाला आहे. सरकारने तातडीने मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अशातच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सरकार दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यात झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली. या बैठकीनंतर कृषीमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून दिवाळीपूर्वी त्यांना भरपाई दिली जाईल असे त्यांनी सांगितले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, ‘ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई सरकार भरपाई देणार आहे. दिवाळीआधी नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल. दिवाळीपूर्वी सर्वांना नुकसान भरपाई मिळेल. राज्याला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांसाठी योग्य आणि चांगला निर्णय सरकार घेईल. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.’
अतिवृष्टीमुळे राज्यातील एकूण ३० जिल्हे बाधित झाले आहेत. १९५ तालुक्यांना मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. तर ६५४ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. राज्यातील खरीप शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात २७,९८,०५४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. १० हजार हेक्टरपेक्षआ जास्त बाधित क्षेत्र असलेल्यांमध्ये १५ जिल्हे आहेत. नांदेड, सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, वाशिम, बुलडाणा, जालना, हिंगोली, अकोलायासह ३० जिल्हयांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे.
– कोरडवाहू पिके प्रति हेक्टर – १८५०० रुपये
– बागायती पिके – १७००० रुपये (प्रति हेक्टर)
– बहुवार्षिक पिके – २२५०० रुपये (प्रति हेक्टर)
– खरडून गेलेल्या जमिनीसाठी (दुरूस्ती होऊ शकणारे) – १८००० रुपये (प्रति हेक्टर)
– खरडून गेलेल्या जमिनीसाठी (दुरूस्ती न होणारे) – कमीत कमी ५००० रुपये आणि जास्तीत जास्त ४७००० रुपये (प्रति हेक्टर)
– वरील मदत एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाईल.
– रेशीम उत्पादन नुकसान झाल्यास -एटी, मलबेरी टसर – ६००० रुपये तर मुगा रेशीमसाठी ७५०० रुपये
– दुधाळ जनावरे दगावल्यास ० ३७,५०० रुपये
– ओढ काम करणारे जनावरे दगावल्यास – ३२००० रुपये
– लहान जनावरे – २०००० रुपये मदत
– शेळी, मेंढी, बकरे, डुक्कर – ४००० रुपये
– मोठी जनावरे मर्यादा – ३
– छोटी जनावरे मर्यादा – ३०
– कुकूटपाल – प्रति कोंबडी १०० (प्रति कुटुंब १०००० रुपये)
– घरे पडझड- ८००० रुपये (प्रति झोपडी)
– पूर्ण घर पडझड पक्की घरे – १,२०,००० रुपये
– गोठा – ३००० रुपये (प्रति गोठा)


