काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अखेर प्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते काँग्रेस पक्षावर नाराज होते. जालना जिल्ह्यामध्ये कैलास गोरंट्याल यांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याचे आणि काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये शिवसेना पक्षात फूट पडली होती. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. या दरम्यान ५० खोके, एकदम ओके ही घोषणा राज्यात गाजली होती. या घोषणेमुळे एकनाथ शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. पण ही घोषणा देणे गुन्हा नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्याच्यासोबत शिवसेनेतील त्यांचे समर्थक गुवाहाटीला पोहोचले होते. काहीजण मागून शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून महायुतीची सत्ता आली होती. या संपूर्ण प्रकरणादरम्यान ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा प्रसिद्ध झाली होती.
५० खोके, एकदम ओके ही घोषणेचा जनक असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीपासूनच ते काँग्रेस पक्षामध्ये नाराज असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. भाजप नेत्यांनी संवाद साधल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सुरु असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर कैलास गोरंट्याल यांनी शिक्कामोर्तब केले.


