अहिल्यानगर : राज्यात गेल्या काही महिन्यात काही नेत्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून भडकाऊ भाषण केले जात असल्याने समाजात तेढ निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, आपल्या आक्रमक भाषणशैलीमुळे चर्चेत असलेल्या खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांचा अहिल्यानगर दौरा असून येथील मुकुंदनगरच्या सी.आय.व्ही ग्राउंडवर ओवैसींची जाहीर सभा झाली. येथील सभेत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषण करत भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कडक शब्दात टीका केली. यावेळी, छोटासा चिंटू म्हणत नितेश राणेंवर टीका केली, तर संग्राम जगताप यांना चिकमी चमेली असा टोला लगावला.
पोलिसांचे आमच्यावर एवढे प्रेम का आहे माहिती नाही, आम्ही आलो की पोलिसांकडून आमच्या हातात तीन तीन पानांचे प्रेम पत्र दिले जाते. त्या पत्रात लिहिलेलं असतं तुम्ही असं बोलू नका, हे करू नका. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार आजची सभा झाली. पण पोलिसांनी हे लक्षात ठेवावं, यापुढे नगर शहरात कोणत्याही स्टेजवर मुस्लिम विरोधात शिव्या दिल्या गेल्या तर आम्हाला पण उत्तर देता येतं, असे म्हणत जलील यांनी पोलिसांना इशारा दिला. आज कुणीही उठतं आणि मुस्लिमांना शिव्या देतात. राजकारण करायचे तर मुस्लिमांना शिव्या द्यायचा ही फॅशन झालीय. आधी छोटासा चिंटू (नितेश राणे) बोलायचा आता तुमच्या शहरात चिकणी चमेली (संग्राम जगताप) आलीय, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली.
तुम्ही गाडीवरून जात असाल तर तुमच्या गाडीवर मागे कुत्रं लागते पण तुम्ही तुमचा प्रवास सुरु ठेवतात. कोणी म्हणत आमच्या मागे अजित पवार आहे, कुणी म्हणतं आमच्या मागे फडणवीस आहे, कुणी म्हणतं शिंदे आमच्या मागे आहेत. पण, या सगळ्यांना आम्ही सोडलं नाही तर तू (संग्राम जगताप ) कोण आहे, असा इशाराही आमदार जगताप यांना दिला. तसेच, बाप तो बाप होता है.. कोणी म्हणत आमच्या मागे अजित पवार, कोणी म्हणत फडणवीस, कोणी एकनाथ शिंदे.. पण आम्ही मोदीला सोडत नाही तू काय चीज आहे, चिल्लर. काही कुत्र्यांना पट्टा बांधला जातो, काहींना रस्त्यावर सोडलं जात, तर काही कुत्रे खुजलीवाले असतात. मी कुणाचेही नाव घेतलेलं नाही, मीडियावाल्यांना काय चालवायचे ते चालवू द्यात, असे म्हणत जलील यांनी नाव न घेता आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुका येत असून दंगली पेटवत माहोल खराब केला जातो आहे, असे जलील यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटले.


