नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर – जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
पालकमंत्री कार्यालयात जनता दरबारच्या माध्यमातून पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्राप्त झालेल्या अर्जावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जुने जिल्हाधिकारी परिसरातील पालकमंत्री कार्यालयात सकाळी ११.३० वाजेपासून पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यास प्रारंभ केला. प्रत्येक नागरिकाचा अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. व्यक्तिगत संवादातून त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे यशस्वीपणे निराकरण केले.
अहिल्यानगर महानगरपालिका, भूमी अभिलेख, जलसंपदा, महावितरण, महसूल, जलसंधारण, वनविभाग यासह इतर विभागाच्या संदर्भातील अर्ज जनता दरबारात प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर गांभीर्याने कार्यवाही करून पालकमंत्री कार्यालयास आणि संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


