बुऱ्हाणनगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता निर्धार मेळावा संपन्न
साकळाई पाणी योजना पूर्ण करणार असून हीच खरी आ.शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पालकमंत्री विखे पाटील यांनी साकळाई पाणी योजना एक वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करताना सांगितले की, “हीच खरी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल.”
पालकमंत्री पुढे म्हणाले की, “अहिल्यानगर तालुक्यातील जिराईत भागासाठी वरदान ठरणारी चौदाशे कोटींची साकळाई पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच एमआयडीसी विस्तारीकरणाचे कामही सुरू असून, पाच हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.”
ते पुढे म्हणाले, “स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण होती. त्यांनी जिल्हा सहकारी बँकेत उत्तम काम केले. त्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता होती. अक्षय कर्डिले यांनी नगर तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करून मजबूत संघटना उभारावी. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.”
या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे नगर जिल्ह्याच्या राजकारणातील बळ होते. आज त्यांची अनुपस्थिती मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. आता त्यांच्या जागी अक्षय कर्डिले यांच्यामागे सर्व कार्यकर्त्यांनी कवचासारखे उभे राहावे. माझ्या आणि त्यांच्यात वयाचे अंतर असले तरी ते माझे जिवलग मित्र होते. त्यांनी पाहिलेले नगर तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू.”
ते पुढे म्हणाले, “अक्षय कर्डिले हे आता समाजासाठी कामाला लागणार आहेत. स्वतःच्या कष्टाने उभे राहावे, लोकांशी नाते निर्माण करावे आणि जनतेचा विश्वास जिंकावा. मी आज खासदार नाही, तरी साकळाई पाणी योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. तुमचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही.”
आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना आठवणीने श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “बुऱ्हानगर हे गाव महाराष्ट्राच्या राजकारणात कर्डिले यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध झाले. ते सर्वसामान्य जनतेचे खरे नेतृत्व होते. जनतेने त्यांच्यावर केलेले प्रेम अक्षय कर्डिले यांच्यावरही अधिक प्रमाणात होईल, यासाठी त्यांनी समाजात सक्रिय व्हावे.”
ते पुढे म्हणाले, “स्वर्गीय कर्डिले हे दिवसाला तीनशे किलोमीटर प्रवास करून जनतेचे प्रश्न सोडवत असत. त्यांच्या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले यांनी पुढे न्यायला हवा.”
या मेळाव्यात आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, दादाभाऊ चितळकर, बाजीराव गवारे, विनायक देशमुख, रोहिदास कर्डिले, देविदास कर्डिले यांच्यासह नगर तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याचा समारोप स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला उजाळा देत आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


