गारपीटग्रस्तांसाठी खा. नीलेश लंके आक्रमक
पाहणीसोबतच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीच्या मदतीची मागणी
पारनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, वाघवाडी, निघोज, टाकळीढोकेश्वर, वडगांव सावताळ, हिवरे कोरडा या परिसरात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या वेदना जाणून घेतल्या.
ढवळपुरी, ढोकी, धोत्रे आणि वाघवाडी या भागांमध्ये पाहणी करताना अनेक शेतकरी कुटुंबांनी झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “नुकसान झाल्यापासून घरातील चूलही पेटलेली नाही,” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली. या वेदनादायक परिस्थितीमुळे खा. लंके भावुक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले.
ढवळपुरी परिसरात कलींगड, गहू, कांदा, काकडी यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे कलींगड पिकांचे पूर्णपणे नुकसान होऊन केवळ वेल शिल्लक राहिल्याचे चित्र दिसून आले. तसेच ढोकी परिसरात कांदा पिकाची पात गळून पडल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत. धोत्रे व वाघवाडी भागात डाळिंब बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पाहणीदरम्यान खा. लंके यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने ई-पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर खा. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. या पत्रात जिल्ह्यातील ४१ गावे बाधित झाल्याचे, सुमारे ३ हजार ५५८.५ हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाल्याचे आणि ७ हजार ३५२ शेतकरी प्रभावित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राहुरी, नगर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांमध्ये विशेष फटका बसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देणे, पंचनामे पारदर्शक पद्धतीने प्रत्यक्ष शेतात जाऊन करणे, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करणे, फळपिके व भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष नुकसानभरपाई देणे तसेच पीक विमा दावे जलदगतीने निकाली काढण्याच्या ठोस मागण्या केल्या आहेत.
शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असून या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मदत प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका खा. लंके यांनी घेतली आहे.
या पाहणीदरम्यान भागा गावडे, सुखदेव चितळकर, डॉ. राजेश भनगडे, राजू रोडे, पप्पू गांगुर्डे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


