राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देऊन परतफेड केली जाईल, असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
सिल्व्हर ओक या निवास्थानी काही पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना पवार यांनी वरील संकेत दिले. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने मला पाठिबा दिला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे पवार यांनी म्हटले आहे.
राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधान सभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र शरद पवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीला मिळणारी एकमेव जागा उद्धव ठाकरे गटाला जाईल, असे मानले जात आहे.
शरद पवार यांच्या विधानामुळे ही एकमेव जागा आता ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत आहे, त्यामुळे ते स्वतः मैदानात उतरणार की, एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


