ऐन निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाने राजकारण तापलं आहे. लोकसभा, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील राजकारणालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदूंनी किमान तीन,चार मुलं जन्माला घातले पाहिजे, असा सल्लाच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हिंदूंना दिला आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या.
माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मौलाना सय्यद कादरी यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की, जर ते खुल्यापणाने सांगत असेल की, 4 बायका आणि 19 मुलं आहेत. तर किमान तीन,तीन चार,चार मुलं जन्माला घातले पाहिजे. त्यांचा विचार हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचा आहे. मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहे. तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातले पाहिजे. यामध्ये काही दुमत नाही’.
शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा करताना नवनीत राणा म्हणाल्या की, ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार हे शरद पवार यांच्या कुटुंबातील आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, मला भाजपसोबत जायला शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे दोन पवार एकत्र होत असेल तर चांगलंच आहे’.
नवनीत राणा यांनी यावेळी ठाकरेंवरही टीका केली. ‘मजबुरीचं नाव जनाब उद्धव ठाकरे झाले आहे. नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही. त्यांच्यासोबत कोणीही आलं तरी, त्यांची परिस्थिती महाराष्ट्रात नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीपेक्षा बेकार परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे. महापालिकेवर भगवा आणि कमळचा झेंडा लागणार आहे, असेही राणा म्हणाल्या.


