लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी काही मतदारांची नावं समोर आणली. हे मतदार एका विशिष्ट मतदारसंघातील आहेत. मात्र, त्यांची नावं वगळण्यासाठी त्यांच्या नावाने भलत्याच व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकानिशी अर्ज करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला, त्या व्यक्तींना स्वत: त्याबद्दल काही माहिती नव्हती. अशा दोन व्यक्तींनाही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत व्यासपीठावर बोलावलं होतं.“मी विरोधी पक्षनेता आहे, मी हे सहज बोलत नाहीये. सबळ पुरावा हातात असताना मी हे बोलत आहे. हा पुरावा एकदम स्पष्ट आहे की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा लोकांना वाचवत आहेत ज्यांनी भारतीय लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. त्याशिवाय, ज्या पद्धतीने मतं वाढवली जात आहेत किंवा कमी केली जात आहेत हेही मी सांगणार आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
“प्रत्येक निवडणुकीगणिक काही लोक नियोजनपूर्वक इतरांची मतं कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. आपण आत्तापर्यंत हे ऐकत आलो होतो. आता आम्हाला त्याचा १०० टक्के पुरावा सापडला आहे. मी १०० टक्के पुराव्याशिवाय आता काहीही बोलणार नाहीये. माझं माझ्या देशावर, इथल्या लोकशाहीवर प्रेम आहे. आता निर्णय तुमचा आहे, मी फक्त तुमच्यासमोर पुरावा मांडणार आहे”, असं आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी मतघोटाळ्याची काही उदाहरणंदेखील उपस्थितांना दाखवली. “कुणीतरी बनावट लॉगइनच्या माध्यमातून कुणीतरी १२ मतं वगळण्याचा प्रयत्न केला. गोदाबाई म्हणतात, माझं नाव वगळण्यासाठी मी अर्ज केलाच नव्हता. यासाठी इतर राज्यांमधील मोबाईल क्रमांक वापरण्यात आले. हे मोबाईल क्रमांक कुणाचे आहेत? हे सगळं कसं घडवलं गेलं? घोटाळा करण्यासाठी ओटीपी कुणी तयार करवून घेतले?” असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.
“सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीने १४ मिनिटांत १२ मतदारांची नावं वगळल्याचं दिसून आलंय. त्याने नावं वगळण्याचे १२ फॉर्म १४ मिनिटांत भरले. ते स्वत: इथे आले आहेत. बबिता चौधरी नावाच्या व्यक्तीचं नाव त्यांनी वगळलं. त्याही इथे आल्या आहेत. पण या दोघांनीही नाव वगळण्यासाठीचा अर्ज केलेला नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.


