उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलेय. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत आपल्या मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या एका वक्तव्यावर भाष्य करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री कधी ना कधी होणार असल्याचे वक्तव्य केले. अजित पवार म्हणाले की, ‘आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. पण योग कुठे आलाय?’ अजित पवार यांच्या या वक्तव्याची राजकीय चर्चा सुरू झाली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 मे ते 4 मे दरम्यान मुंबईतील वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, धावपटू ललिता बाबर, नेमबाज राही सरनोबत,ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अजित पवार उपस्थित होते. राही भिडे यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.
जागतिक कामगार दिन हा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या मात्र योग यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं मात्र योग कुठे आलाय. कधी ना कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, असे म्हणत अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली.
राज्यात अनेक पक्ष झाले. वैचारिक मतभेद झाले. मात्र मनभेद कुणाशी होऊ नये. आजी-माजी मुख्यमंत्री गौरव आम्ही उद्या करणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान आज केला आहे. मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता, त्यात अदिती तटकरे यांच्या खात्याला पहिला क्रमांक मिळाला. माझं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं १ खातं ३५ टक्क्याच्या खाली आहे. आम्हाला त्यावर काम करायचं आहे, असे अजित पवार म्हणाले.


