‘लग्न’ की ‘सापळा’? नवऱ्याला बसला मोठा धक्का….
नवरी उडी मारून पळाली…..
पाथर्डी ;तालुक्यातील सुसरे येथे एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, एजंटमार्फत पैसे देऊन आणलेल्या नवरीने लग्नानंतर अवघ्या काही तासांतच घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील २४ वर्षीय तरुणाचे जालना जिल्ह्यातील एका मुलीशी एजंटच्या मध्यस्थीने लग्न ठरविण्यात आले होते. यासाठी मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम देण्यात आली होती.३ एप्रिल रोजी सकाळी विधिवत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास नववधू सुसरे येथे नवरदेवाच्या घरी दाखल झाली.
घरात पारंपरिक शुभविधी पार पडले. नव्या संसाराची सुरुवात होत असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास नववधूने घरातील मोबाईल, एक तोळ्याची पोत तसेच नवरदेवाने घातलेले एक तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले.सकाळी हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेव व त्याच्या नातेवाईकांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.या घटनेमुळे ग्रामीण भागातील विवाह व्यवस्थेतील वाढत्या अडचणी आणि एजंटमार्फत होणाऱ्या विवाहातील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत. मुला-मुलींच्या विवाहासाठी निर्माण झालेल्या सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पोलिसांकडून संबंधित नववधू व एजंटचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


