क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताविरूद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला होता. पण आता ८ दिवसांतच पाकिस्तानचं डोकं आयसीसीने ठिकाण्यावर आलं असून पाकिस्तान सरकारने माघार घेतली आहे. यासह आता भारत-पाकिस्तान संघांमधील हायव्होल्टेज लढत येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताविरुद्ध सामना खेळण्याच्या सूचना दिल्या केल्या आहेत. सरकारने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली. यासह आता रविवार १५ फेब्रुवारी रोजी टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
पाकिस्तान व बांगलादेश क्रिकेट बोर्ड तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यात सलग चर्चा सुरू होत्या. ICC चे प्रमुख जय शाह यांच्या सल्लामसलतीनंतर झालेल्या या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) भारताविरुद्ध सामना खेळण्याचे आवाहन केले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने आपली भूमिका बदलली.
पाकिस्तान सरकारने निवेदनात म्हटलं आहे की, “बहुपक्षीय चर्चांमधून सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याने तसेच मैत्रीपूर्ण राष्ट्रांच्या विनंतीचा विचार करून, पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाला १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकातील नियोजित सामन्यासाठी मैदानात उतरण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.”
या संपूर्ण नाट्यावर पडदा पडल्याचे स्पष्ट करत ICC नेही प्रतिक्रिया दिली. “ICC आणि PCB यांच्यातील संवाद व्यापक चर्चेचा भाग होता. दोन्ही पक्षांनी खेळाच्या सर्वोत्तम हितासाठी प्रामाणिकपणा, तटस्थता आणि सहकार्य राखत एकत्रित व सकारात्मक भूमिका घेतली,” असे ICC कडून सांगण्यात आले.
बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनात, गेल्या आठवड्याच्या शेवटी पडद्यामागे झालेल्या चर्चांचा संकेत दिला होता.
“काल (रविवार) पाकिस्तानला दिलेल्या भेटीनंतर आणि चर्चेतून सकारात्मक निष्कर्ष अपेक्षित असल्याने, संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या हितासाठी पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळावा, अशी मी विनंती करतो,” असे माजी बांगलादेश कर्णधार अमिनुल इस्लाम यांनी म्हटलं होतं.


