Monday, February 23, 2026

‘या’ कारणासाठी अजितदादांनी विश्वास नांगरे पाटीलांची नगरहून पुण्याला केली होती बदली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) विश्वास नांगरे पाटील यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली, यावेळी त्यांनी दादांच्या आठवणी लिहिल्या आहेत.

अहिल्यानगर येथे एसपी असताना आपले राजकीय गणित जमत नव्हते, असा स्पष्ट अनुभव माजी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्या काळात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. अचानक आलेल्या फोनमध्ये “तुमची पुणे ग्रामीणला एसपी म्हणून नेमणूक होत आहे, जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याचे नांगरे पाटील सांगतात.

पूर्वी कोणताही व्यक्तिगत परिचय नसतानाही पोस्टिंगनंतर अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे कोणासाठीही दादांकडून दबावाचा फोन आला नाही, असा ठाम अनुभव त्यांनी नमूद केला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे आयजी म्हणून कार्यरत असताना चाकण, तळेगाव, मुळशी परिसरातील तब्बल २५ गुंडगिरी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला, तर १५० हून अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. या कारवाईनंतर अजित पवार यांनी आवर्जून फोन करून अभिनंदन केल्याची आठवण नांगरे पाटील यांनी सांगितली.

एसपी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिम महाराष्ट्र आयजी म्हणून तीन वर्षे काम करताना कोणत्याही चुकीच्या बाबीसाठी दादांनी दबाव टाकल्याचा अनुभव कधीच आला नाही. बोलण्यात नेहमी अदबीचा सूर असायचा सुरुवातीला “अहो नांगरे पाटील”, नंतर आपुलकीने “अहो विश्वासराव” आणि फोनवर “ऐका ना” अशी प्रेमळ साद असायची.

दादांची कामाची पद्धत अत्यंत पद्धतशीर आणि शिस्तबद्ध होती. पोलीस क्रीडास्पर्धांदरम्यान पंचाने जीन्स पॅन्टला उभी इस्त्री केल्याबद्दल त्यांना सुनावल्याचा किस्सा याच शिस्तीचे उदाहरण आहे. परिसराची स्वच्छता, टापटीप यावर त्यांची बारीक नजर असे. बारामती पोलीस स्टेशनच्या बांधकामावेळी ते किमान डझनभर वेळा साईटवर गेले. बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट राहावा, यासाठी त्यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. परिणामी ‘फाईव्ह स्टार’ दर्जाचे पोलीस ठाणे उभे राहिले.

उद्घाटनावेळी चकाचक लॉकअप आणि समोरचे हिरवेगार लॉन पाहून त्यांनी मिश्कीलपणे, “आता चोरांना अशा पॉश लॉकअपमध्ये ठेवलं तर ते जामिन मागणारच नाहीत,” अशी टिप्पणी केली होती.

दिसायला आणि बोलायला कडक असले तरी दादा अत्यंत संवेदनशील होते. भोरजवळील धरणात बोट उलटून २७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी शासकीय निधीची वाट न पाहता त्या प्रत्येक कुटुंबाला जागेवरच दोन लाखांची मदत दिली.

हायवेवरील डिव्हायडरच्या मुद्द्यावर त्यांनी नांगरे पाटील यांना जाब विचारला. मात्र अपघातांबाबत सादर केलेले सविस्तर प्रेझेंटेशन ऐकल्यानंतर त्यांनी जाहीर सभेत कौतुक केले आणि हा उपक्रम राज्यभर राबवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या.

पुण्यात एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी सन्मान केला आणि पुण्यातून ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले.

मनाने हळवे, शिस्तीने कडवे आणि स्वभावाने मावळे असलेले हे नेतृत्व सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेले होते. दीनदलितांविषयी कळवळा, विकासाची दूरदृष्टी आणि निर्भीड निर्णयक्षमता यांचा संगम असलेले हे व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्रातून निघून गेले आहे.

“नियती क्रूर झाली की क्षणात होत्याचे नव्हते होते,” अशा शब्दांत नांगरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत दादांना आदरांजली वाहिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles