लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. महिलांना केवायसी करायला सांगितले आहेत. मात्र, केवायसी केल्यानंतर महिलांना अपात्र केले जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहेत. केवायसीआधीच ५२ लाख महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे, असा दावा केला जात आहे. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले आहे. केवायसीआधीच लाडक्या बहिणींची पडताळणी केली आहे. यातून ५२ लाख महिलांचे अर्ज बाद होत असल्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे सांगितली जात आहे. आता यावर स्वतः आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेतून ५२ लाख महिलांना अपात्र केली असल्याची बातमी निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. “प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर / शासन निर्णयाच्या माध्यमातून / अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. e-Kyc ची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी e-Kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती, अशा आशयाची पोस्ट आदिती तटकरेंनी शेअर केली आहे.


