राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या योजनेतून जवळपास ६० लाखांपेक्षा जास्त महिला कमी होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी २६ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यावरुनच लाखो महिलांची नावे वगळण्यात आल्याचे दिसत आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात २१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सामाजिक न्याय व आदिवासी विभागाकडून ६ हजार कोटी आणि ऐनवेळी मागणीतून ८ ते ९ हजार कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेचा भार इतर विभागांवर पडला आहे. राज्यातील कंत्राटदारांचे ७४ हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यातच आता महिला व बालविकास विभागासाठी २५ हजार ६०० कोटी रुपये दिले आहेत. यात लाडकी बहीण योजनेसाठी २१ हजार कोटी राखीव आहेत.
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत २ कोटी ४७ लाखांपर्यंत लाभार्थ्यांची संख्या पोहचली होती. दरम्यान, यातून निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांना वगळण्यात आले. ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला आहे. यासोबतच अनेक पुरुष लाभार्थ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता. त्यांनाही पैसे मिळणार नाही. याचसोबत लाखो महिलांनी केवायसी केली नाही त्यांचे अर्ज बाद केले आहे.
अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.तोपर्यंत महिलांनी केवायसी केली तरच त्यांचा लाभ सुरु राहणार आहे.
केवायसीमध्ये शिल्लक लाभार्थ्यांची संख्या २४ लाखांपर्यंत आहे. याआधीच ४५ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यानंतर केवायसी पडताळणीत २४ लाखांपैकी १५ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामुळेच एकूण ५० ते ६० लाख महिला अपात्र ठरु शकतात. यामुळे फक्त २ कोटींपर्यंत महिला लाभार्थी असतील


