राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. दर महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जात आहेत. योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली; परंतु या योजनेमुळे आम्हाला दुःख असल्याचे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी म्हटले आहे.
राज्यात असलेल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांसाठी सदरची योजना सुरु केली. अर्थात या योजनेत पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये टाकले जात आहेत. दरम्यान योजनेसाठी इतर निधी कमी करून लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम टाकली जात आहे. यावरूनच शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना सुरु केली; मात्र आम्हाला योजनेमुळे दुःख आहे. कारण या योजनेसाठी आदिवासींचा निधी जात असेल, तर आम्ही हा विषय अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. आमच्या आदिवासींचे पैसे आम्हाला द्या, तसेच लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजना वर्ग करू नये; असे यात मांडणार असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले.
योजना चांगली आहे युती सरकार चांगली योजना राबवत आहे. परंतु आमचे पैसे का घेत आहे? सरकारने आमच्या योजनेचे पैसे वळवायला नको ही आमची इच्छा आहे. आमचे पैसे वळवले जात असतील तर नुकसान आदिवासींचे आहे. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहोत की आमच्या आदिवासींचे पैसे योजनेसाठी वळवू नका. वाटले तर या योजनेसाठी दुसरा विभागाच्या निधी घ्यावा; पण आमच्या आदिवासी विभागाचे घेऊ नये; अशी मागणी करणार असल्याचे पाडवी यांनी स्पष्ट केले.


