स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या, पण भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक होईल आणि कदाचित सर्वात अखेरीस महापालिकेची निवडणूक होईल. या निवडणुका आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत. स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ. जिथे अडचणी असतील तेथील लोकांना आमच्याशी चर्चा करावी.पण शक्यतो निवडणुका महायुतीत करायच्या ,जिथे महायुतीत निवडणूक होणार नाही, तिकडे आपल्या मित्रपक्षावर कुठलीही टीका करायची नाही. आपण राज्यात सोबत काम करत आहोत, त्यामुळे आपल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही. आपण 2017 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तेत होते, रोज आपल्यालाच शिव्या द्यायचे, ते आपल्याला करायचे नाही. महायुती होणार नाही तिथे आपल्याला समन्वय ठेवून मैत्रीपूर्ण लढत करायची आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्यायचं आहे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. ते सोमवारी वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात बोलत होते.

माझी एक विनंती आहे की, राज्यात आपल्यासाठी अनुकूलता आहे. लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत. पण भाजप पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यात लहानसहान वाद आहे, हे वाद नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत. हे फार मोठे वाद नाहीत. भाजप हा परिवार आहे, दोन भावांमध्ये कमी अधिक होत असतं. पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, बसलं पाहिजे, वाद संपवले पाहिजेत. बघा, अनेक पार्ट्यांचं पतन याकरता झालं, एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्यात घातलं. अशाप्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये. कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करत असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला अनुकुलता आहे. सध्या आपल्या पक्षात सगळीकडे कार्यकर्ते उपलब्ध आहेत. याचं मोठं उदाहरण म्हणजे यापूर्वी शिवसेनेच्या नावावर एका दिवसात रक्तदान शिबिरात 25 हजार बाटल्या करण्याचा विक्रम होता. पण 22 जुलैला आपल्या अध्यक्षांनी आदेश दिल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतकं रक्तदान केलं की, एका दिवसात रक्ताच्या 78 हजार बाटल्या गोळा झाल्या. आपण मनावर घेतल्यावर काय करु शकतो, हे याचं उत्तम उदाहरण आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी अधोरिखित करण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles