लाडकी बहीण योजनेसाठीची ईकेवायसीतील दुरुस्ती करण्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ईकेवायसीनंतर ही संख्या १ कोटी ७६ लाखांवर आली आहे. योजनेच्या सुरुवातील २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांची असलेली ही संख्येत घट होऊन जवळपास ७१ लाख महिला या योजनेतून बाद होणार आहेत. मंगळवारी या ईकेवायसीच्या दुरुस्तीचा अखेरचा दिवस आहे.
केवळ अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठी असलेल्या या याजनेत सधन महिला तसेच सरकारी कर्मचारी महिलांनीही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर ईकेवायसीच्या माध्यमातून अन्य बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्याची योजना आखण्यात आली.
त्यानुसार ईकेवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली. २ कोटी ४७ लाख महिलांतून ई केवायसीमध्ये १ कोटी ७० लाखांच्या आसपास महिलांना ईकेवायसी करण्यात यश आले. मात्र यादरम्यान अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांतून चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला. अशा महिलांच्या तक्रारीनंतर दुरुस्तीकरण्यासाठी पुन्हा एकदा ३१ मार्चची मुदत देण्यात आली. ही मुदत मंगळवारी संपत आहे.


