राज्यामध्ये सध्या २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. ही निवडणूक पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. याच आठवड्यामध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यामधील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. यामधील १७ जिल्हा परिषद आणि ८८ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकाकडून केली जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक महापालिका निवडणुका पार पडल्यानंतरच होणार आहे. सध्या २९ महानगर पालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये २९ जिल्हातील संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहे. काही महापालिकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधिकारी आणि अतिरिक्त अधिकारी या कामामध्ये व्यस्त आहेत.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश दिले होते. पण आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम झाला आहे. या आरक्षणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशिर होत आहे. पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ७ फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


