अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फुले दांपत्य स्मारक समिती व समाज बांधवांच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान, गरज पडल्यास फुले दांपत्याच्या स्मारकासाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी असा ठरावही करण्यात आला आहे.
माळीवाडा येथे फुले दांपत्य स्मारक समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत समाज बांधवांनी भूमिका स्पष्ट केली. सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले यांनी सांगितले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे ऊर्जास्थान अहिल्यानगरमध्ये उभे राहणे ही सर्व समाजाची भावना आहे. प्रशासनाने स्मारक उभारणीचे काम तातडीने सुरू करावे. स्मारक भव्य स्वरूपात उभे राहण्यासाठी वेळप्रसंगी माळीवाडा वेस पाडण्याचाही निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.बैठकीनंतर या मागणीचे निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले.यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, भगवान फुलसौंदर, दत्ता गाडळकर, नगरसेविका गीतांजली काळे, शीतल ढोणे, वर्षा सानप, सुजाता पडोळे, रूपाली दातरंगे, मंगल भुजबळ, शेंडीच्या सरपंच प्रयागाताई लोंढे, मनोज ताठे यांच्यासह विविध समाजांचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत पद्मशाली समाजाचे नेते गणेश विद्ये, श्रीनिवास बौज्जा, महेंद्र बिज्जा, अॅड. राजेंद्र गाली, स्वकुळ साळी समाजाचे कृष्णा बागडे, कैकाडी समाजाचे अध्यक्ष विशाल माने, पारनेरचे ओबीसी नेते खंडू भुकन, ओबीसी अध्यक्ष दीपक खेडकर, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माउली मामा गायकवाड, अशोक फलके, नाभिक समाजाचे अनिल निकम, सत्यशोधक समाजाचे ज्ञानदेव खराडे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष ब्रीजेश ताठे यांच्यासह अन्य अनेक मान्यवर सहभागी झाले होते.नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी सांगितले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारणे हे सर्व अहिल्यानगरकरांचे स्वप्न आहे. स्मारक उभारणीस काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आंदोलन करण्यासही समाज मागे हटणार नाही. वेशीच्या आडून राजकारण करणार्यांना समाजकंटक म्हणून जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

बैठकीत विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्मारक उभारणीची मागणी एकमुखाने मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले. राजेंद्र पडोळे यांनी आभार मानले. बैठकीला फुले दांपत्य स्मारक समितीचे पदाधिकारी, फुलेप्रेमी आणि मोठ्या संख्येने विविध समाजांचे नेते उपस्थित होते. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे यांनाही पाठविण्यात आले आहे.


