सख्खा भाऊ पक्का वैरी असं म्हटलं जात. जमिनी आणि संपत्तीच्या हव्यासापोटी हे दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर उठायला देखील कमी करत नाहीत. मात्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भारसवाडा गावात संवेदनशीलतेचा अनोखा आदर्श पाहायला मिळाला आहे. राजेश्वर धनुरे या तरुणाने आपल्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर गरोदर असलेल्या वहिनीशी लग्न करून तिचा आधार झाला. राजेश्वरच्या निर्णयामुळे आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे शीतलला आणि तिच्या बाळाला नव्याने एक कुटुंब मिळालं. या आदर्श तरुणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारसवाडा येथील संतोष धनुरे या २४ वर्षीय तरुणाचा सात महिन्यांपूर्वी शीतलसोबत विवाह झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी शीतल तीन महिन्यांची गरोदर होती. या कठीण परिस्थितीत शीतलचे भविष्य सुरक्षित राहावे आणि तिच्या पोटातील बाळाला आधार मिळावा यासाठी सरपंच आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.
गर्भवती शीतलचे लग्न मयत संतोष याचा लहान भाऊ राजेश्वर याच्याशी करुन देण्याचा प्रस्ताव गावकऱ्यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयापुढे मांडला. प्रथा परंपरा आणि समाज काय म्हणेल या भीतीने कुटुंबीयांनी निर्णय घेण्यास वेळ घेतला. मुली कडच्या आणि मुलाकडच्या लोकांची गावकऱ्यांनी समजूत घातली आणि दोन्ही कुटुंबीयांनी लग्नास होकार दिला. त्यानुसार संतोषचा लहान भाऊ राजेश्वर याचा शीतलसोबत विवाह लावून देण्यात आला.
राजेश्वरने आपल्या वहिनीचा हात धरत तिच्या पोटातील बाळाला वडिलांचे नाव आणि प्रेम देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुला , मुलीची आर्थिक परिस्तिथी हलाकीची असल्याने संपूर्ण गावाने लग्नाचा खर्च उचलला. शीतल आणि राजेश्वरच्या लग्नात गावजेवण देण्यात आले. भारसवाडा गावाने तसेच धनुरे कुटुंबाने दाखवलेली ही संवेदनशीलता समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


