भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्ती फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला. भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. फोडा फोडीत भाजपचे आयुष्य चालले असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत, अशी झणझणीत टीका राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि.२९) नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर केली.
सिन्नर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत मंत्री कोकाटे यांनी भाजपसह शिंदेसेनेला लक्ष्य केले. कोकाटे म्हणाले, महाराष्ट्रात आपसांतच लढाया सुरू आहेत. त्यात युतीमध्ये सर्वाधिक संघर्ष आहे. विरोधी पक्षात तो काहीच दिसत नाही. गेल्या दहा वर्षांपासून आपण सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बदलण्याची मागणी करत आहोत. नगरविकास खात्याकडून ते झाले नाही, मात्र आता ते सिन्नर दत्तक घ्यायला निघाल्याचा आरोप कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला.
सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, दत्तक घेण्याच्या कोणीही घोषणा करू नये, असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे श्रेय कुणी एकाने घेऊ नये, तो सामुदायिक निर्णय आहे. येत्या २ तारखेपर्यंत आम्ही आमचे पक्ष सांभाळू, तीन तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी पुन्हा एकत्र येऊ, असेही कोकाटे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत वरंदळ. अॅड. राजेंद्र चव्हाणके, सीमंतिनी कोकाटे, अण्णासाहेब गडाख, विजय वरंदळ, तालुकाध्यक्ष संतोष कदम, मनीषा माळी, कृष्णा कासार, सुनील गवळी यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.
मंत्रिपद बदलले तरी मी खरंच बोलणार
कृषी समृद्धी योजना मी आणली. त्यामुळे आज शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा फायदा झाला. मी कृषिमंत्री असताना तेच म्हणत होतो आणि आजही तेच म्हणतोय. शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, त्यांना अनुदानावर योजना द्या. शेतकऱ्यांचा १०० टक्के भांडवली खर्च सरकारने केला पाहिजे. दहा ते पंधरा टक्के निधी लाभार्थीचा घेतलाच पाहिजे. सर्व फुकट नको. फुकट दिले की गोंधळ होतो. माझे मंत्रिपद बदलले तरी मी आजही खरेच बोलतो असेही कोकाटे यांनी सांगितले.


