अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी माहितीच्या आधारे गंभीर शंका आणि आरोप उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचा प्रश्न निर्माण झाला असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवारांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
रोहित पवारांनी अजितदादांच्या विमान अपघातावर दोन पत्रकार परिषदा घेऊन डीजीसीए नियम, मुख्य पायलट सुमित कपूर यांच्यावर शंका उपस्थित केल्या. पायलटला ब्लॅकमेल केले गेले का किंवा विमानात स्फोट घडवण्यासाठी अतिरिक्त इंधन कॅन होत्या का, असे गंभीर आरोप त्यांनी केले. याशिवाय, अपघात तपासणीचा महत्त्वाचा भाग असलेला ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यावर अजितदादांचे पुत्र जय पवार यांनीही ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होऊ शकत नाही, अशी शंका व्यक्त करत पारदर्शक चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.


