अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करणे आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामात लक्ष घालावे, अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी लोणी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली.
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची माहिती आमदार जगताप यांनी देत तातडीने काम सुरू करण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना केली.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क करून छत्रपती संभाजीनगर रस्त्याची माहिती घेतली व दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या तत्परतेबद्दल आमदार जगताप यांनी त्यांचे आभार मानले.
छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठं-मोठे खड्डे.. महामार्गावरून वाहणारे पाणी… अन् धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावर नादुरुस्त होणाऱ्या वाहनांची वाढती संख्या अन् त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोजच्या लहान मोठ्या अपघातांमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहेछत्रपती संभाजीनगर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. खड्ड्यांमुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी महामार्गालगत गॅस पाईपलाईनचे काम झाले होते. त्यावेळी संबंधित कंपनीकडून अनेक पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविल्याने विविध ठिकाणी महामार्गावरून पाणी वाहत आहे. खड्डे अन् धुळीमुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे.
मनमाड महामार्गावरून वळविलेल्या वाहतुकीमुळे महामार्गावरील रहदारी वाढली आहे. मोठंमोठ्या खड्ड्यांत कंटेनरसारखी वाहने नादुरुस्त होऊन बंद पडतात. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळते. व्यावसायिक धुळीमुळे दुकाने बंद ठेवत आहेत. धुळीच्या साम्राज्यामुळे महामार्गा लगतचा व्यावसायिकांचे ’शटर डाऊन’ झाले आहे.
गेल्या वीस वर्षांत महामार्गाची इतकी विदारक परिस्थिती कधीही पाहावयास मिळाली नव्हती. महामार्गावरून अक्षरशः जीव मुठीत धरून नागरिक प्रवास करीत आहेत. महामार्गाच्या दुर्दशेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा, विद्यालयांमध्ये पोहोचण्यास उशीर होत आहे. तसेच सायकलवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे


