सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही !
खा. नीलेश लंके यांचा मा. खा. डॉ. सुजय विखे यांना नाव न घेता टोला
पारनेर बाजार समितीत विकास कामांचे लोकार्पण
२१ वी वार्षिक सभाही उत्साहात
पारनेर : प्रतिनिधी
काहींची पुरती जिरली तरी ते टिका, टिपन्नी करण्याचे सोडत नाहीत. म्हणतात ना की, सुंभ जळाला तरी पिळ जळत नाही. ज्यांनी काही एक सामाजिक काम केले नाही ते टिका टिपन्नी करत असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी नाव न घेता मा. खा. डॉ. सुजय विखे यांना टोला लगावला.
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच विविध कामांच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात खा. लंके हे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सभापती किसनराव रासकर, बाबाजी तरटे, सुदाम पवार, अशोक कटारिया, मारूती रेपाळे, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, गंगाराम बेलकर, बापूसाहेब शिर्के, डॉ. आबासाहेब खोडदे, विजय पवार, डॉ. पद्मजा पठारे, मेघा रोकडे, चंदन भळगट, तुकाराम चव्हाण, राजू शेख, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, रविंद्र राजदेव, मोहन रोकडे, अशोक रोहोकले, डॉ. सादीक राजे, बाळासाहेब नगरे, उत्तम गाडगे, बाळासाहेब पुंडे, ॲड. राहुल झावरे, कारभारी पोटघन, संतोष काटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
खा.लंके म्हणाले की,१९८१ मध्ये बाजार समिती सुरू झाली. विविध आमदारांनी या समितीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. निवडणूकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात आल्या. बाजार समितीची सत्ता हाती आल्यानंतर शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला आपण सार्थ होऊ की नाही हा प्रश्न होता, मात्र संचालक मंडळोने हा विश्वास सार्थ ठरवला. पूव बाजार समितीचा नफा २७ लाख होता. आज मात्र पहिल्या वर्षात १ कोटी ३२ लाख तर दुसऱ्या वर्षी २ कोटी १७ लाखांचा नफा आहे. तसेच ३ कोटींच्यावर ठेवी असून त्यातून २५ लाख रूपये व्याज मिळते असा या संचालक मंडळाचा कारभार पारदश असल्याचे खा. लंके म्हणाले.
प्रतिकूल परिस्थतीत बाजार समिती सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे आज ही बाजार समिती सुस्थितीत आहे. भाळवणी येथे व्यापाऱ्यांनी एक दिवस कांदा लिलाव सुरू करावेत. जागेच्या बाबतीत ४ हेक्टर ३२ आर जागेची मागणी करण्यात आली असून नवी जागा उपलब्ध होणार असल्याचे लंके म्हणाले.
कांद्याची माळ घालून आपण कांद्याच्या भाववाढीसाठी, निर्यातीस परवानगीसाठी संसदेत आंदोलन केले. दूधाच्या हमीभावासाठी, भेसळ रोखण्यासाठी आंदोलन केले. संसदेमध्ये दुधाच्या किटल्या नेऊ दिल्या जात नव्हत्या. मोठी सुरक्षा असूनही आम्ही त्या घेऊन गेलो. दूध भेसळ थांबविण्याची तसेच उत्पादन खर्चावर भाव ठरले पाहिजेत अशी ठाम मागणी केली. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला पाहिजे असे सांगत खा. लंके यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार संसदेत आवाज उठवत असल्याचेही खासदार लंके यांनी नमूद केले.
वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न
एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. हल्ली राजकारणात सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. राज्याच्या सरकारमधील जे जबाबदार राज्यामध्ये फिरतात. त्यांना समाजात चिथावणी देण्यासाठी पाठवलेले असते. ते वेगवेगळया नेते मंडळींवर खालच्या पातळीवर बोलतात. काल जयंत पाटील यांच्यावर मध्यंतरीच्या काळात सुप्रियाताईंवर, शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्ये करण्यात आली. वेगवेगळया मार्गाने वातावरण दुषीत केले जात आहे. राज्य सरकारमधील प्रमुखांना माझी विनंती आहे, तुम्हाला आता चांगले वाटत असेल परंतू यामुळे तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा घालत आहात. त्याचा तुम्हाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. असे वक्तव्य करणारांवर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत.
खासदार नीलेश लंके
महाराष्ट्राची संस्कृती बिहारच्या दिशेने
महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे न शोभणारे आहे. ३५ वर्षे सुसंस्कृत राजकारण करणाऱ्या नेत्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या संयमी व्यक्तीबद्दल बोलणे चुकीची आहे. महाराष्ट्राची संस्कृती बिहारच्या दिशेने वाटचाल करते आहे असे दिसते. मात्र चुकीच्या वक्तव्याचा निषेध केलाच पाहिजे. जिल्हा राष्ट्रवादी तसेच बाजार समितीच्या वतीने मी त्या आजी आमदारांचा निषेध करतो असे सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आ. गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्यावर आपले मतप्रदर्शन केले.
सत्ता नसतानाही काम कसे करायचे याचा अनुभव खा. नीलेश लंके यांच्याकडे आहे. केंद्राचा निधी कसा आणायचा, संबंधित मंत्र्याला कसे आपलेसे करायचे हे गणित ते शिकले कुठे हा प्रश्न आहे. लोकांमध्ये अहोरात्र मिसळणारा, इंग्रजीमध्ये शपथ घेणारा खासदार ही क्रांती सामन्य जनतेने घडविली असून त्यांनी महासत्तेला पराभूत केले असल्याचे फाळके म्हणाले.


