राज्यात 29 महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचा महापौर बसणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे येथे या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता तिथेही महपौरपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. असे असतानाच आता एका महानगरपालिकेत मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांच्या या डावपेचामुळे भाजपा एकदम चितपट झाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या डावपेचामुळे आता या महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. भाजपासाठी हा चांगलाच धक्का असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. येथे एकूण 78 जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपाला एकूण 37 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काहीही झाले तरी येथे भाजपाचाच महापौर बसेल, असे सांगितले जात होते. परंतु श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी सूत्र हाती घेत मोठ्या घडामोडी घडवून आणल्या आहेत. उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या 38 वर गेली आहे. दुसरीकडे भाजपाचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा एक उमेदवार कमी म्हणजेच 37 वर आले आले आहे. सविता तोरणे यांचा शिवसेना प्रवेश हा उल्हासनगरमध्ये गेमचेंजर ठरला आहे. तोरणे यांच्या पक्षप्रवेशासह तिथे शिवसेना वंचितचे दोन्ही उमेदवार सोबतघेऊन सत्तेत बसणार आहे. तिथे शिवसेनेचाच महापौर होणार, असे सांगितले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा, असा चंग भाजपने बांधला होता. मुंबईच्या निवडणुकीत 89 वॉर्ड जिंकून भाजप या स्वप्नाच्या जवळही पोहोचली आहे. एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक सोबत असल्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित आहे. नेमक्या याचवेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपची गरज ओळखून एक मोठा डाव टाकला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईच्या महापौरपदाची मागणी केली जाऊ शकते. यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे यांच्याकडून घातली जाऊ शकते. याशिवाय, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि सदस्य पदांवरही शिंदे सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. तसे घडल्यास मुंबईच्या राजकारणात नवी रंगत निर्माण होऊ शकते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेच 29 नगरसेवक निवडून आले होते. तर ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. भाजप आपल्याशिवाय मुंबईत महापौर बसवू शकणार नाही, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुरेपूर आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी करण्याचा डाव टाकला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


