खंडोबा यात्रेपूर्वी नगर–मनमाड रस्त्याला वेग द्या; डॉ. सुजय विखे पाटील यांचा ठेकेदाराला सुचना
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर–मनमाड राज्य महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आज शुक्रवारी भल्या सकाळी राहुरीत हजेरी लावत ठेकेदाराला पुन्हा कडक सूचना दिल्या.
सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत कामाचा आढावा घेतला आहे.
राहुरी शहरात दरवर्षी होणाऱ्या खंडोबा याञेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी नगर–मनमाड राज्य महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान त्यांनी शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर थेट रस्त्यावर येऊन ठेकेदाराला कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक आणि भाविकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी यात्रेपूर्वीच काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नगर–मनमाड राज्य महामार्गाचा निधी आणि कामकाज अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाकडे पुन्हा लक्ष देत ते लवकर पूर्ण व्हावे, यासाठी विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
यावेळी दादा पाटील सोनवणे, नगरसेवक अरुण साळवे, राजेंद्र उंडे, अमोल काशीद, नंदकुमार डोळस, सचिन मेहत्रे, अजित डावखर, नरेंद्र शेटे, सुजय काळे, युवराज गाडे, दिनेश उंडे, संतोष बर्डे, जितू बर्डे, शांताराम शेटे, सुरेश भुजाडी, कारभारी डौले, सचिन भोंगळ, राजेंद्र वराळे, ठेकेदार महेश गायकवाड, संपर्क अधिकारी मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते.
नगर–मनमाड रस्त्याच्या कामाला गती; डॉ. विखे पाटील यांच्या पुढाकाराचे कौतुक
नगर–मनमाड राज्य महामार्गाच्या कामासाठी डाॅ.सुजय पाटील यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका अत्यंत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेक अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या बहुचर्चित रस्त्याचा प्रश्न त्यांनी गंभीरतेने घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि कामाला गती मिळवून दिली.रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या तसेच अपघातांचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करणारे नेतृत्व म्हणून डॉ. विखे पाटील यांचे प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय असल्याचे नागरिकांनी सांगितले.


