राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सध्या गोंधळाची परिस्थिती दिसत आहे. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्राने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर आज सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार का? अशी चर्चा आहे.
दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणावर रोज नवनवीन माहिती तपासातून समोर येत आहे. आता भोंदू खरात प्रकरणी एसआयटीकडून काही डॉक्टरांचीही चौकशी होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात चाललेल्या गोंधळाबाबत शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊतयांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे अजित पवारांचे सहकारी होते. सुनेत्रा पवारांचे ते सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत आम्ही बोलण्याचा संबंध येत नाही. पण मी एक खात्रीने सांगतो. भविष्यात हा पक्ष २५ ते ३० आमदारांसह भाजपात विलीन होईल.
मी वारंवार हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे आणि सुनेत्रा ताई पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा ताई पवारांचे ते सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षानं का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं, कोणती पद दिलं हा त्यांचा विषय आहे असे खासदार संजय राऊत म्हणाले.


