राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. २८ जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी आयोगाकडे केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कुणाकडून आयोगाकडे पत्र गेले असेल, तर ते आता वैध धरू नये, असे सुनेत्रा पवार यांनी आयोगाला कळवले आहे.फेब्रुवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची माहिती या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिली आहेच; शिवाय २८ जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे-पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर लगेच आता सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलेल्या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते तटकरे आणि पटेल यांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. “२८ जानेवारी २०२६ नंतर झालेला पत्रव्यवहार पक्षाकडून झालेला असेल तर तो वैध धरू नये. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यापुढे मी जो पत्रव्यवहार करेन तोच वैध धरावा,” अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे तटकरे-पटेल यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मंगळवारी ‘देवगिरी’ निवासस्थानावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते; त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आयोगाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावर अद्याप तटकरे किंवा पटेल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


