आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकत्र दिसण्याची शक्यता जवळपास संपू लागली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधील स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे उभा राहणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमधील महत्त्वाचा मानला जाणार राष्ट्रवादी हा घटकपक्ष भंडारा जिल्ह्यात एकत्र निवडणूक लढवणार आहे. तशी माहितीच प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्वच ठिकाणी युती करून निवडणूक लढवली तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे शक्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी एकला चलो रे, चे संकेत दिले आहेत. ‘काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीचे गणित जुळून आले तर एकत्र लढणे शक्य होईल. आमच्या महायुतीतील तिन्ही घटकपक्षांचे कार्यकर्ते हे उत्सुक आहेत. नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत. स्वाभाविकच आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते. महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही,’ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.तसेच एखाद्या ठिकाणी तडजोड करायची असेल तर ती करू. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहोत. एखाद्या ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं करू, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर बोलताना बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका असं सांगितले होते, असे विधान केले. यावर बोलताना ‘बिहारच्या स्थानिक लोकांनी ठरवलं, पक्षाचा कुठंही आग्रह नव्हता. आम्ही कुठंही प्रचाराला गेलो नाही. स्थानिक स्तरावर पक्षाचे जे संघटन असते त्या संघटनेतील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते. बिहारची निवडणूक लढवण्याचा निर्णय बिहारमध्ये स्थानिक पातळीवर झाला, अशी सारवासारव पटेल यांनी केली.


