राज्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. मुळात शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याने शाळांमध्ये मुलांना पाठविण्यास पालक वर्ग तयार नाहीत. परिणामी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होत चालली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती असून जिल्हा परिषद सीईओनी कठोर कारवाई करत पटसंख्या कमी असलेल्या शाळांमधील ३५ शिक्षकांचे निलंबन केले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आजच्या स्पर्धेच्या काळात मागे पडत आहेत. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे; यासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत असतात. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम देखील चांगला दिसून आला आहे.
जिल्ह्यातील शाळा बंद पडण्याची स्थितीत
दरम्यान बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. बहुतांश शाळांमधील पटसंख्या हि बोटावर मोजण्या इतकी राहिली आहे. यामुळे शाळा बंद पडण्याची स्थितीत आहे. यामुळे याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
सीईओंकडून कारवाई
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या २० शाळांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये कार्यरत असलेल्या ३५ शिक्षकांचे निलंबन आदेश जारी केले आहेत. तसेच ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सीईओंच्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात मात्र खळबळ उडाली आहे.



कोणत्या जिल्ह्याची बातमी आहे