शिवसेना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांवरून राज्यात महायुतीत मोठी कुस्ती सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यास सुरुवात केल्याने शिंदे गोटात मोठी खळबळ उडाली होती. आमच्या पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे, अशी तक्रार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. असे असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून पैसे वाटले जात आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी निलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले असता सुरुवातीला रविंद्र चव्हाण यांनी काढता पाय घेतला. परंतू, रविंद्र चव्हाण यांनी मोठे सुचक विधान केले असून मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची असल्याचे वक्तव्य केले आहे. यानंतरच यावर मी उत्तरे देईन, असेही ते म्हणाले आहेत. मी नंतर यावर भाष्य करेन, असे थेट विधान रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. निलेश राणे जे आरोप करत आहेत, त्यावर तुमचे काय मत आहे, असे विचारल्यावर हे सर्व आरोप खोटे आहेत, असे थेट स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे.शिवसेना आमदार निलेश राणे यांनी चव्हाण हे आदल्यादिवशी मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी आले होते, त्यांनीच हे पैसे दिले असल्याचा आरोप केला आहे. यावरून मालवणात जोरदार राजकारण रंगले आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपात आलबेल नसल्याचे बोलले जात आहे दरम्यान, २ डिसेंबरनंतर नेमके काय होणार? महायुतीत पडद्यामागे काही हालचाली होत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


