अजित पवारांच्या निधनानंतर १८ व्या दिवशीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष हडपण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, रोहित पवारांनी या नेत्यांच्या संशयास्पद हालचाली आणि ‘काळी जादू’ प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. रोहित पवारांनी म्हटलंय की, अजित पवारांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार ‘कार्याध्यक्षांना’ (प्रफुल पटेल) देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली आहे.
काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली. हा कागद १०. ०३. २०२५ चा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात २८ जानेवारी २०२५ ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. २६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होत कि, आमचा पक्षाचा कॉस्टिट्युशन बदलला आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष ) ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं, सर्व निर्णय हे ते घेतील असा या पत्रात म्हटलंय. कोण होतं नेशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असावे असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पुढे रोहित पवारांनी बोलताना म्हटलं की, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल, भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही असं मला वाटत माझं जयशी बोलणं झालं नाही. व्हीएसआर कंपनीला वाचविण्याचं काम सुरु आहे या कंपनीला अपघातानंतर सुद्धा ८० ते ९० कोटी रुपये दिले. राहुल गांधी यांची मी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितले जिथे तुला न्याय मिळेल त्या राज्यात तुझी FIR कर त्यामुळे आम्ही कर्नाटकात गेलो आणि तिथे झिरो एफआयआर झाला, अशी माहिती देखील रोहित पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे.


