अमेरीका इराण युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे, त्यापैकी एक गॅसटंचाई. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात गॅसटंचाई उद्भवली आहे. अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत, तर अनेकांच्या घरातील गॅस संपला असून नव्या सिलेंडरसाठी पायपीट करावी लागत आहे. अशातच आता देशात उद्भवलेल्या एलपीजी तुटवड्यावर अभिनेते आणि चित्रपट निर्माते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भेडसावणाऱ्या एलपीजी तुटवड्यावर 60 वर्षांचे अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटलंय की, पुरवठ्यातील या कमतरतेचा परिणाम अनेक शहरांमधील कुटुंब, हॉटेल्स आणि अगदी स्मशानभूमींवरही होत आहे. पश्चिम आशियामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे इंधनाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. गेल्या शनिवारी, घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक सिलेंडर्सच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. प्रकाश राज यांनी आपल्या पोस्टमध्ये एलपीजीच्या तुटवड्यावरुन मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलंय की, “प्रिय नागरिकांनो, जसं आता आपण पाहतोय की… घरे, हॉटेल्स आणि अगदी स्मशानभूमींवरही परिणाम होत आहे. आता यावर गोभी ‘भक्तांची’ प्रतिक्रिया काय आहे, ते बघायचं…”


