तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अजूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजितदादांसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा दावा करताना त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे फोटो, कागदपत्रे दाखवलेले आहेत. रोहित पवार यांच्या दाव्यानंतर अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित केली जात आहे. असे असतानाच आता डीजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत. या अहवालानुसार ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचे सांगण्यात आले आहे.
22 पानांचा अहवाल समोर
या अहवालानुसार अपघातादरम्यान विमान अगोदर झाडावर आदळले. त्यानंतर विमान जमिनीवर आदळले. पुढच्याच क्षणी विमानाचा मोठा अपघात झाला. समोर आलेला हा अहवाल 22 पानांचा आहे. अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला. या स्फोटानंतर उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाले असे या अहवालातातून समोर आले आहे. याच अहवालात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा, ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याचा तात्पुरता निष्कर्ष काढण्यात आला आहे. अपघाताचे अंतिम कारण CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला? कारण काय?
अजितदादांच्या विमान अपघाताची काही संभाव्य कारणं या प्राथमिक अहवालात सांगण्यात आली आहेत. यामध्य VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा, टेबल-टॉप रनवे तसेच फिकट मार्किंग, मानवी घटक/दृश्य भ्रम MET माहितीची मर्यादित अचूकता अशी काही या अपघाताची कारणं आहेत. विमानतळावर रनवे मार्किंग फिकट फिकट होती. सोबतच रनवेवर सैल खडी, पुरेशी कुंपण/सीमा भिंत नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
Visibility VFR मर्यादेपेक्षा कमी असूनही लँडिंगचा प्रयत्न.
VIP/Non-Scheduled फ्लाइटसाठी अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील ऑपरेशन.
हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.
एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.
अजितदादा यांच्या विमान अपघाताचा एका संस्थेचा हा अहवाल आला आहे. परंतू हा प्राथमिक अहवाल आहे. या अपघाताचा तपास अनेक यंत्रणा समांतरपणे करत आहेत. त्यात सीआयडी, सीबीआय पासून अनेक यंत्रणा गुंतलेल्या आहेत. त्यांचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन मागणी करणार आहोत असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.


