रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यात इंधन व घरगुती गॅस पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी सिलेंडरच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले. पेट्रोलियम उत्पादने व घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारी वाहने ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यांना सर्व महामार्ग, प्रमुख रस्ते तसेच अंतर्गत मार्गांवरून निर्बंधमुक्त वाहतूक करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, अशा वाहनांना अडवणे, त्यांचा मार्ग रोखणे, चालकांना धमकावणे किंवा कोणत्याही प्रकारे वाहतुकीत व्यत्यय आणणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर संबंधित फौजदारी तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.स्थानिक प्रशासनाने या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच गरजेनुसार इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला असून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तो लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इंधन पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू …
- Advertisement -


