राज्याच्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी पक्षावर फुटीचं संकट घोंघावत आहे. एका बाजुला नेते वाद अडकत असताना राष्ट्रवादीत नाराजी उफाळून आली आहे. पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी थेट पक्षातील नेत्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागलाय. त्याचदरम्यान आता पक्षात बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यात या नाराज कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय आधार बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीत लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर फक्त सुनेत्रा पवार, अजित पवार आणि पार्थ पवार यांचेच फोटो होते. इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा, अगदी प्रदेशाध्यक्षांचाही फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले.
अजित पवार यांच्यास निधनानंतर पक्षातील आधार गेला आहे. आम्ही पक्षातील नेते एकमेकांचा आधार बनत आहे. घरातील कर्ता पुरूष गेला तर घरातील दुसरा कर्ता व्यक्ती इतर व्यक्तींना आधार देतो, त्याने घरातील लोकांना सांभाळून घेणं अभिप्रेत असतं. परंतु येथे कोणी आमचं ऐकून घेत नाही.
अजित पवार यांचे निधन कशामुळे झालं, त्यांचा घातपात झाला आहे का? त्याच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फक्त अमोल मिटकरी करत आहेत. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच बोलत नाहीये. त्याप्रकरणात नेमकं काय चालू आहे, ते तळागळातील नेत्यांना कळत नाहीये. त्याची माहिती मिळाली पाहिजे. एकदा सुनेत्रा पवार यांच्या भेट घेऊन त्यांची विचारणा करू. उत्तर मिळालं नाहीतर पक्षातील नेत्यांविरोधातच आंदोलन करू, असा इशारा उदयकुमार आहेर प्रदेश उपाध्यक्षांनी दिला आहे. पक्षात मराठा नेता नाही त्यामुळे आणचं कोणीही ऐकून घेत नाहीये, असंही आहेर म्हणालेत.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही फक्त सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाच आमचे नेते मानतो.” त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत वरिष्ठ नेत्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, “ठराविक मर्जीतील नेत्यांनाच संधी आणि बळ दिले जाते, मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते,” अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. “आमचा राजकीय आधारच हरपला आहे. आमच्याकडे लक्ष देणारा कोणीच उरलेला नाही, त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहोत,” असे उदय आहेर यांनी सांगितले.


