शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला साक्ष देणारी एक भावनिक घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे. हडपसर येथील साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हमीद सुयोग बेंद्रे याने आपल्या वर्गशिक्षिका शारदा दवडे यांच्या अचानक झालेल्या बदलीविरोधात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राने विद्यार्थ्याचं शिक्षिकांवरचं प्रेम दिसून आलं.
पुण्यातील हडपसर येथील साधना प्राथमिक विद्यामंदिर येथे शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने शाळा सोडून जाणाऱ्या शिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी विनंती केली. या पत्रात हमीदने अत्यंत निरागस आणि भावनिक शब्दांत विनंती केली , “ताई खूप छान शिकवतात, त्या कधीच ओरडत नाहीत, त्यांची बदली करू नका.” हा पत्राचा मजकूर आणि त्यासोबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांना डोळ्यांत अश्रू आणणारा ठरत आहे.
हमीदच्या या पत्रात त्याने आपल्या शाळेचे नाव, वर्ग, शिक्षिकेचं नाव नमूद करून, ताईंची बदली झाल्याचं समजल्यावर झालेलं दुःख स्पष्ट केलं. “मला खूप रडू आलं,” असं ही तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, आई-वडिलांनी त्याला सांगितलं की तुम्ही ताईना परत आणू शकता म्हणून हे पत्र लिहतो आहे. या पत्राने केवळ शिक्षकांबाबतच स्नेहच नव्हे, तर एका लहान मुलाच्या मनात शिक्षकांबद्दल असलेलं प्रेम, विश्वास आणि नात्याची खोल जाणीव समोर आली आहे.
शिक्षिका शारदा दवडे यांचं मुलांना शिकवण्याचं कौशल्य, विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागण्याची शैली यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. त्यामुळे त्यांची बदली अनेक विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. हमीदचं हे पत्र समाजमाध्यमांवर झपाट्याने पसरत असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना शिक्षक बदल्यांचं नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या भावनाही महत्त्वाच्या असल्याचं मत मांडलं आहे.
पुण्यातील हडपसर येथील शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याने शाळा सोडून जाणाऱ्या शिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी शरद पवार यांना पत्र लिहले आहे. या पत्रात विद्यार्थी म्हणाला, “माझे नाव हमीद सुयोन बेद्रे. माझ्या शाळेचे नाव-साधना प्राथमिक विद्यामंदिर, पुणे हडपसर २८ आहे. मी इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्गशिक्षिकाः सौ. शारदा दवडे ताई आहेत. मला आज असे कळले आहे की त्या मला उदया पासून शिकवायला येणार नाहीत. त्यांची अचानक बदली केली आहे. हे ऐकून मला खूप रडू आले. मग मी मम्माला आणि पप्पांना विचारले. बाईना परत आणायला काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या ताईना परत आणू शकता. कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा.” असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे.


