बारामतीमध्ये जे घडले, ते राहुरीत का नाही घडले? महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा सवाल

अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीने भावनिक वातावरण; नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू

जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार – उमेदवार अक्षय कर्डिले

अहिल्यानगर : राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला. या दौऱ्यात वाघाचा आखाडा, तांदूळवाडी, आरडगाव, मानोरी, वळण, पिंपी वळण, चंडकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, शिलेगाव कोंडवड आदी गावांचा समावेश होता.
या दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीने ग्रामस्थ भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ग्रामस्थांनी मत व्यक्त करत सांगितले की, ही निवडणूक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे लागली आहे. राहुरी तालुक्यात ‘कामाचा माणूस’ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी विकासाच्या प्रश्नांपासून ते नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत जनतेशी घट्ट नाते निर्माण केले होते.
ही निवडणूक विकासाची असून आरोप-प्रत्यारोपांची नाही, असेही ग्रामस्थांनी नमूद केले. “बारामतीमध्ये जे घडले, ते राहुरीत का नाही घडले?” असा सवाल करत स्वर्गीय आमदार कर्डिले यांनी लाईट, पाणी, रस्ते, सभामंडप आदी विकासकामे मार्गी लावल्याचे सांगितले. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनता अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की, राहुरी तालुक्यातील गावांशी आणि माझ्या वडिलांशी अतूट प्रेमाचे नाते होते. प्रत्येक शब्दाचा मान ठेवणारे ते नेतृत्व होते. कुटुंबाप्रमाणे त्यांनी जनतेशी ऋणानुबंध जोडले होते. ही पोटनिवडणूक म्हणजे आमच्यासाठी दुःखाचा डोंगर आहे. मी लहानपणापासून पाहत आलो आहे की, माझ्या वडिलांनी जनतेच्या हितासाठी आयुष्य झोकून दिले.
जनतेने माझ्या वडिलांवर दाखविलेला विश्वास मी कामाच्या माध्यमातून संपादन करीन, असे त्यांनी सांगितले. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आजारपणातही शासनाकडून निधी मंजूर करून गावांच्या विकासासाठी कामे केली. त्यांनी तयार केलेला विकास आराखडा माझ्याकडे असून त्यानुसार प्रत्येक गावातील विकासकामे पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
“जनतेचे प्रेम पैशाने मिळत नाही. ते मला माझ्या वडिलांमुळे मिळाले आहे. माझे वडील नसल्यापासून जनतेनेच मला सांभाळले आहे. आपल्या सर्वांमध्ये राजकारणापलीकडचे नाते निर्माण झाले आहे. वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मला मतरूपी आशीर्वाद द्या, जेणेकरून मी जनतेचा विश्वास सार्थ ठरवू शकेन,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारी न दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गावदौऱ्यात माझ्या वडिलांनी केलेल्या विकासकामांच्या आठवणी जाग्या होत असल्याचे सांगत पुढील तीन वर्षांत एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दौऱ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बनकर, शरद पेरणे, तानाजी धसाळ, विक्रम तांबे, विनीत धसाळ, उत्तम म्हसे, रवी मोरे, अमोल भनगडे सुरेखा म्हसे, रवींद्र म्हसे, विजय ढुबे, ताराबाई वाघ, उत्तम खुळे, मनीषा खुळे, यास्मिन शेख, कारभारी खुळे, दत्ताभाऊ खुळे, जालिंदर काळे, भास्कर पंडित, शिवाजी हापसे, शरद पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles