मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकारणात खळबळ उडाली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या भेटीवर स्वत: राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भेटीमागचं कारण सांगितले आहे. ‘प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधू नये. सूचना द्यायच्या असतील तर भेटी नको का? काल शिंदेंना भेटलो उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल. कुणी कुणाला भेटावे यामागे राजकारण शोधू नये.’, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचं कारण सांगितले. यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, डेव्हलमेंट, परप्रांतीयांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘कुणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला त्यामधून राजकारण शोधायचे असे नाही. एकतर तीन वर्षानंतर निवडणुका आहेत. आता तर परिस्थिती तशी नाहीच आहे. निवडणुका संपलेल्या आहे. आज ते सत्तेवर आहेत. आम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील. जर चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेट व्हायला नको का? प्रत्येक वेळेला त्यामधून काही तरी राजकारण शोधले पाहिजे याची काही आवश्यकता नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटेल.’
राज्यातील शहराची परिस्थिती बिकट असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, ‘आज मुंबई, पुणे, ठाण्यासह अनेक शहरांचे प्रश्न आहेत. जे प्रश्न आम्हाला वाटतात ते सांगण्याची गरज नाही का? त्यादिवशीच मी सांगितले असते कशासाठी भेटलो होतो ते. आपल्या शहराची जी काही रोजची परिस्थिती दिसते ती खूपच बिकट आणि विचित्र आहे. ही परिस्थिती भीषण अवस्थेला पोहचली आहे. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला वाटते डेव्हलेपमेंट म्हणजे रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे आणि पूल बांधणे याला आपण प्रगती म्हणतो पण मला वाटते ती सूज आहे. आपल्याकडे चांगले रस्ते, पूल व्हावेत पण आपण मूळ गोष्टींना हात घालत नाही. आज संपूर्ण मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्वच शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे. जिथे २५ ते ४० माणसं राहत होती तिथे आज ४०० माणसं राहत आहेत. जागा तेवढीच आहे, रस्ते तेच आहे.’
तसंच, ‘आज रस्ते तयार नाहीत, सगळीकडे वाहतूक कोंडी होऊन बसली आहे. आज सर्वच शहरांचा हा प्रश्न आहे. शहरांमध्ये येणारी माणसं आणि गाड्या थांबत नाहीत. हे सर्व प्रकरण आपण कुठे नेणार आहोत. मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांना भेटून जी गोष्ट सांगितली होती तिच गोष्ट मी एकनाथ शिंदेंना भेटून सांगितली. ही गोष्ट त्यांनी ताबडतोब भूषण गगराणी यांना फोन करून सांगितले की काय करायला पाहिजे. आज गाड्या कुठेही पार्क केल्या जातात. ओला-उबेरवाल्यांना अक्कल नसते. गाड्या चूकीच्या ठिकाणी पार्क केल्यावर ५ हजार, डबल पार्किंग केले तर १० हजार रुपये दंड लावा. ही भिती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शहरांना शिस्त येणार नाही. या सर्व गोष्टी मी त्यांच्या कानावर घातल्या. पण आपल्याकडे कसे होते या सर्व गोष्टी सांगितल्या तरी आपल्याकडील लोकांचा विश्वास बसत नाही. त्यांना वाटते की असणार यामध्ये काही तरी असणार. असणार तर असणार तुम्हाला काय चर्चा करायच्या आहेत त्या करत बसा. मी त्यांना भेटून फाइल दिली आहे ती त्यांनी गगराणींकडे पाठवली आहे. पुढचे काय होईल ते गगराणींना विचारा.’, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.


