सोशल मीडिया नव्हे तर आपल्या आतला आवाज ओळखा – लेखक वैभव ढूस
अहिल्यानगर जिल्हा वाचनालय व्याख्यानमाला पुष्प दुसरे
नगर -“विज्ञानाच्या वेगवान युगात हाती असलेला मोबाईल व त्यावरील सोशल मीडिया यामधून तरुण पिढी विचलित होत आहे. माध्यमांचे महत्त्व सातत्याने वाढत असले तरी आपली कुवत ,आवड, परिस्थिती या सगळ्यांचा विचार करून सोशल मीडियाच्या “मोटिवेशनल “च्या नव्हे तर आपला स्वतःचा आतला आवाज ओळखा व कृती करा असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व वक्ते वैभव ढूस यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प “अंत: अस्ति प्रारंभ: या विषयावर गुंफताना ते तरुणाईशी संवाद साधत होते. त्याप्रसंगी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर मरकड, वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे संचालिका शिल्पा रसाळ, ज्योती कुलकर्णी ,संचालक राहुल तांबोळी, किरण आगरवाल ,कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल ,कुमारी पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.
वैभव ढूस यांनी सद्यस्थितीबद्दल अनेक विषयांना स्पर्श करताना “आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कला, क्रीडा यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. मुलांना घरात ज्या गोष्टीला प्रतिबंध केला जातो त्याच गोष्टी बाहेर करण्याचा ध्यास उगवत्या भविष्यातील पिढीला नैराश्या येण्याचे कारण बनत आहे.
आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार ,शिकवण , वेळोवेळी दिलेले धोक्याचे इशारे हे भविष्यात आपल्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण असल्याचे सतत वेगवेगळ्या वळणावर कळत जाते. त्यामुळे आई-वडिलांचे महत्त्व हे देवापेक्षा कमी नाही असेही ते म्हणाले.
” पुस्तके माणसाला कसे जगायचे ते शिकवतात. ज्यांचे हाती पुस्तक आहे तो कधी एकटा पडत नाही. त्याच्या वाट्याला अपयशाला पचवण्याची व परतवून लावण्याची ताकत वाचनातून निर्माण होते. समृद्ध व संस्कारी पिढी घडविण्याचे अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे कार्य हे प्रेरणादायी आहे. अशी “ज्ञानमंदिरे” गावागावात उभी राहावीत.यातून देशाला कुटुंबाला व स्वतःला चैतन्यमय बनवणाऱ्या पिढ्या निर्माण व्हाव्या.. कारण ही काळाची गरज असल्याचे ढूस म्हणाले .
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी करून मान्यवरांचा सन्मान केला. सूत्रसंचालन प्रा .ज्योती कुलकर्णी, परिचय शिल्पा रसाळ तर आभार दिलीप पांढरे यांनी मानले. यावेळी व रसिक नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक, तसेच ग्रंथपाल अमोल इथापे ,सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल,पल्लवी कुक्कडवाल, संकेत फाटक ,सौ वर्षा जोशी ,संजय गाडेकर ,निखिल ढाकणे , सिकंदर शेख यांचे सहकार्य लाभले.


