महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, अतिवृष्टीचा इशारा, २० जिल्ह्यांना अलर्ट
पुणे: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे शुक्रवारी (दि. 23) तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. मात्र, अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेले नाही. मात्र, या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनार्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने राज्यात 24 ते 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने रविवारी (दि. 25) अवघ्या राज्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
शुक्रवारी दक्षिण कोकण किनार्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. ते पुढील 24 तासांत उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे कोकण किनार्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दोन दिवसांत दाखल होईल. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं हाहाकार माजवला आहे. पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिकच्या घाटमाथ्यावर, पुणे , अहमदनगर, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


