Rinku Rajguru अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आणि करिअरमधील पहिलाच चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटातून तिला किती पैसे मिळाले आणि त्या पैशांचं तिने काय केलं, असा प्रश्न तिला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना रिंकू म्हणाली,,
किती पैसे मिळाले हे नाही सांगणार पण त्याचं काय केलं हे मात्र सांगेन. मी दहावीची पुस्तकं विकत घेतली. मी कधीच माझ्याजवळ पैसे ठेवत नाही. मला नाही आवडत. मला फक्त एवढं कळतं की.. एवढे एवढे पैसे ठरले आहेत. मी बाबांकडे देते किंवा पूजाकडे देते. मला जसे पैसे लागतील, तसे त्यांच्याकडून मागून घेते. मला आता हे हवंय, हे घेऊन द्या किंवा मला पैसे द्या, मी जाऊन घेते. माझं अकाऊंट बाबा आणि पूजा मॅनेज करतात. माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हेसुद्धा मला माहीत नाही. मी त्यांना विचारायलाही जात नाही. मला आवडतही नाही. मला जेवढे पैसे लागतात, मी त्यांच्याकडून मागून घेते. एखाद्या ट्रिपला जायचं असेल तर ती अरेंज करून द्या, असं त्यांना सांगते. माझ्याकडे जी-पे पण नव्हतं, आता काही दिवसांपूर्वी ते सुरू करून दिलं. माझ्याकडे पैसेच नसायचे,” असं तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आता गुगल पे सुरू केल्याने, जिथे गरज लागते तिथे मी पैसे देते. पण मला पैसे जवळ ठेवायला आवडत नाही. माझ्याकडे काहीच नसतं. सगळं पूजा आणि बाबांकडे असतं. बाबा म्हणतात मला की तू शिक, तेव्हा मी त्यांना म्हणते की हो शिकेन. पण काही शिकले तर नाही अजून. ते बघून घेतील, असं मला वाटतं. कारण आपल्याला लहानाचं मोठं करताना त्यांनी हिशोबाचा विचार केला का? मला एवढंही माहीत आहे की माझ्या कमाईतला ते आठाणा किंवा एक रुपयाही वापरत नाहीत. पुण्यातल्या घराबद्दल पण ते म्हणाले, एवढं सगळं आहे, असं करायचं आहे, तर त्यांना मी म्हणाले की.. घ्या. माझ्यासाठी ते करतात, विचारतात. पण पैसे जवळ ठेवणं, हिशोब करणं मला आवडत नाही.”


