माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अंबादास दानवे यांना मध्यरात्रीच्या सुमारास सातत्याने धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२, १३ आणि १४ मार्च रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून सतत फोन येत होते. १५ मार्च रोजी रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी पुन्हा फोन आला. ज्यामध्ये तुला कापून टाकू, ठोकून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दानवे यांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या महिन्यातच अंबादास दानवे यांची सरकारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
मी धमक्यांना घाबरत नाही. पोलिसांना नंबरसहित या तक्रारीची माहिती दिली आहे. ते मला जीवे मारण्याची धमकी असं बोलले आहेत. पण मला याची सवय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित फोन नंबर कोणाचा आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.


