संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. तसंच त्यांनी यावेळी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला. ‘अजितदादांना शरद पवारांसोबत जायचं होतं हे त्यांच्या बॉडीलँग्वेजवरून दिसत होतं. विमानात दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फायली होत्या का? कारण अजितदादा नेहमी बोलायचे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फायली माझ्याकडे आहेत. पडद्यामागं काही तरी घडण्याची प्रक्रिया सुरू होती.’, अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगताना दिसत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजप आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.
अजित पवार यांचा पक्ष आता मराठमोळ्या अस्मितेचा राहिला नसून, तो पूर्णपणे भाजपच्या नियंत्रणाखाली गेला आहे. ज्या पक्षावर दरोडा टाकून तो शाहांनी अजित पवारांच्या हातात दिला, तो आता गोयल, पटेल आणि पारेख यांचा होण्याची शक्यता आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून निशाणा साधला. अजित पवार हे भाजपच्या अजेंड्यावर काम करू शकत नसल्यानेच त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये अविश्वासाची भिंत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.अजित पवारांचा पक्ष हा आता पवार पाटील यांचा पक्ष राहिलेला नाही. हे आम्ही कालही सांगितलं. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. हा मूळ पक्ष शरद पवारांचा आहे. पण डाके आण दरोडे टाकून तो अमित शाहांनी त्यांच्या हातात दिला आणि त्याला लेबल लावले आहे. सुरुवातीला तो शाहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. पण अशा पद्धतीने महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मिता जपणार पक्ष भाजपने गिळून टाकला. आता त्या पक्षातील आमदार खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वत:ला मराठी समजू नये, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
अजित पवार यांना जे ओळखतात. त्यांनी भाजपसोबत काम केले नाही. सत्तेसाठी एकत्र आले, काही संकंट भाजपने लादली. घोटाळ्याचे आरोप झालं. ईडी, सीबीआय मागे लावली. त्यामुळे इतर राजकारण जे करतात तेच त्यांनी केलं. ते तेवढ्यापुरतं भाजपसोबत सरेंडर झाले. आपल्यावरच्या फाईली शहाणपणाने क्लिअर केल्या. त्यानंतर ते पुन्हा मूळ प्रवाहात स्वगृही येण्याची धडपड करत होते, असा दावाही संजय राऊतांनी केला.


